पुणे : ‘समाजमाध्यमांमुळे वाचनसंस्कृतीचे स्वरूपही बदलत आहे. हा बदल सकारात्मक आणि समाजाला दिशा देणारा असला पाहिजे. त्यासाठी सर्वच प्रकारच्या माध्यमांमध्ये सकस आणि दर्जेदार लेखन व्हायला हवे,’ अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
‘कमलदूत’ दीपावली विशेषांकाच्या प्रकाशन समारंभ ३१ ऑक्टोबर २०१८ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. लोहगाव विमानतळावरील अतिथीगृहात हा छोटेखानी सोहळा पार पडला. या प्रसंगी ‘कमलदूत’चे संपादक व पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, लक्ष्मण जगताप, भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता युवा मोर्चाच्या स्वरदा केळकर उपस्थित होत्या.
फडणवीस म्हणाले, ‘अक्षराच्या सादरीकरणाचे माध्यम बदलल्याने संपर्काचा वेग झापाट्याने वाढत आहे. नव्या तंत्रज्ञानाने ज्ञानाची कवाडे विस्तारली आहेत. देशोदेशीच्या सीमा ओलांडून जनसामान्यांची मतमतांतरे जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचत आहे. ही क्रांती गतीमान आहे. साक्षरतेचा वेग वाढविण्यासाठी त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. मराठी साहित्यातील दिवाळी अंकांनी साहित्य विश्व उजळवून टाकले आहे. त्याला फार मोठी परंपरा इतिहास आहे. हे अंक आता डिजिटल स्वरूपात सर्व भाषांमध्ये जायला हवेत. मायमराठीचा सन्मान त्यामुळे वृद्धिंगत होईल.’
तब्बल बावीस वर्षे ‘कमलदूत’ पाक्षिक प्रकाशित होत असल्याचा संदर्भ देत पालकमंत्री बापट म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी या नात्याने केलेले काम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे पाक्षिक सुरू झाले. आता कसबा मतदारसंघात ‘कमलदूत’ ही वाचकांची चळवळ झाली आहे. या चळवळींने लोकशिक्षणाचे काम हाती घेतले आहे. यंदा प्रथमच दीपावलीच्या निमित्ताने संचित हा विषय ‘कमलदूत’ने हाताळला आहे.’
विंदा करंदीकर, ग. दि. माडगुळकर, बाबुजी फडके, पु. ल. देशपांडे, अनंतराव भालेराव, राजारामबापू पाटील यांसारख्यांचा प्रभाव असणाऱ्या अनेक दिग्गजांनी या अंकात योगदान दिले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस, संगीतकार प्रभाकर जोग, अविनाश सोवनी, सुधन्व रानडे, नितीन गडकरी, डॉ. नीलम गोऱ्हे, निशिकांत भालेराव, लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, राहुल सोलापूरकर, पोपटराव पवार, सतीश मगर, झेलम चौबळ आदींचा समावेश आहे. स्वरदा केळकर यांनी सूत्रसंचालन केले.